जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२३
देशातील अनेक राज्यात रेल्वेच्या अपघाताची मालिका सुरु असतांना राज्यात देखील अशाच प्रकारे एक अपघात समोर आला आहे. मुंबई-अहमदाबाद पॅसेंजर रेल्वे गाडीचे इंजिन डब्यांपासून वेगळे होऊन सुटून पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकात ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या सर्व घटनेमुळे प्रवाशांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीकाळ ठप्प देखील झाली.
मुंबईहून-अहमदाबादच्या दिशेने जाणारी पॅसेंजर रेल्वे गाडी नेहमीप्रमाणे दुपारी दोन वाजताच्या सुमारास वैतरणा रेल्वे स्थानकात आली होती. रेल्वे गाडी वैतरणा स्थानकातून सुटण्याच्या वेळी अचानक रेल्वेच्या डब्यांना जोडलेले इंजिन अचानक वेगळे होऊन पुढे गेले. यामुळे इंजिनपासून वेगळे झालेल्या प्रवाशांनी भरलेल्या रेल्वे डब्यांना झटका लागला. रेल्वे गाडीला अचानक झटका लागल्याने रेल्वे डब्यांमध्ये असलेले रेल्वे प्रवासी भयभीत झाल्याने प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली.
रेल्वे इंजिन डब्याविनाच पुढे गेल्याचे मोटरमनच्या निदर्शनास येताच त्याने लगेचच रेल्वे इंजिन थांबवले. यामुळे पश्चिम रेल्वेची गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून मुंबई अहमदाबाद पॅसेंजर रेल्वे गाडीचे डबे या इंजिनला पुढे जोडून ही गाडी पुन्हा स्थानकातून रवाना करण्यात आली. रेल्वे गाडी भर वेगात असताना जर रेल्वे इंजिन अशाप्रकारे सुटून पुढे गेल्याचा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती. मात्र सुदैवाने रेल्वे स्थानकात रेल्वे सुटण्याच्या वेळी कमी वेग कमी असताना हा प्रकार घडल्याने सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले.