राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारच्या काळात विरोधकावर ज्या केसेस झाल्या याबाबत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला इशाराच दिला आहे.
अजित पवार म्हणाले कि, खोट्या केस दाखल करणे महाराष्ट्राची परंपरा नाही. खोट्या केस दाखल करणार असतील तर मोगलाई लागल्यासारखे आहे. राजकीय विरोधक आहेत म्हणून कोणी जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही शांत बसणार नाही. आम्हाला अनेक मार्गांचा वापर करता येतो. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे म्हटले होते. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. परंतु पवार साहेबांनी आणि आम्ही त्यांची समजूत काढली. चूक असेल तर नक्कीच कारवाई करायला हवी. जवळपास साडे सतरा वर्ष सत्तेत होते. आमच्या समोरही विरोधी पक्ष होता. परंतु आम्ही असा प्रयत्न कदापी केला नाही. जनता हे बारकाईने पाहत असते. इतक्या खालच्या पातळीवर राज्याचे राजकारण जाणार असेल, सरकारी यंत्रणांचा वापर होणार असेल तर आम्हालाही वेगवेगळ्या आयुधांचा वापर करावा लागेल. राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांना अजित पवारांनी फटकारले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी हा शाहू-फुलेंच्या विचारांनी पुढे जाणारा पक्ष आहे. आमच्या पक्षात सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, याचा प्रयत्न केला जातो. मूळ विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून जो बाऊ केला जात आहे. त्याला काडीचा अर्थ नाही. राष्ट्रवादीची भूमिका जनतेसमोर आम्ही पक्ष स्थापनेपासून कायम स्पष्टपणे मांडली आहे. आता कुठेतरी सत्ताधारी पक्षांच्या पोटत दुखत असेल म्हणून काहीतरी वेगळा अप्रचार करण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. महागाई आणि बेरोजगारी वरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.