जळगाव मिरर / ७ मार्च २०२३ ।
राज्यात सर्वत्र होळीचा सन सुरु असतानाच काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या लाखमोलाच्या पिकांचा आणि स्वप्नाचा अक्षरश: चुराडा झाला. जिल्ह्यात तब्बल २ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने सोमवारी वर्तवला. यामध्ये १ हजार ८०३ हेक्टरवरील गहू आणि ७७७ हेक्टरवरील द्राक्षबागांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १९१ गावांमधील २ हजार ७९८ शेतकरी या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. याशिवाय वीज अंगावर पडल्याने चार जनावरांचाही मृत्यू झाला.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये रविवारपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. निफाड, इगतपुरी, नाशिक, कळवण आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत तुलनेने पावसाचा जोर अधिक आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. गहू, कांदा पिकांसह द्राक्षबागांची सर्वाधिक हानी झाली आहे. सर्वाधिक १ हजार ८०३ हेक्टवरील गव्हाचे नुकसान केले आहे. त्यापैकी १ हजार ७४५ हेक्टर क्षेत्र निफाड तालुक्यातील, तर ५८.३० हेक्टर क्षेत्र नाशिक तालुक्यातील आहे. निफाडमधील ६६० तर नाशिकमधील ११७ अशा ७७७ हेक्टवरील द्राक्षबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. नाशिक तालुक्यातील ६१.५० हेक्टरवरील कांद्याची पावसाने हानी केली आहे.
शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बाधित शेतीचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. बाधित एकही व्यक्ती सरकारी मदतीपासून वंचित राहू नये, नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.