जळगाव मिरर | १९ मार्च २०२४
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सध्या पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता एन्ट्री घेतली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या येथील निवासस्थानी पोहोचले होते. त्यांच्यातील बैठक आता संपन्न झाली असून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आता मुंबईत गेल्यावर राज ठाकरे दिल्लीतील भेटीबाबत बोलणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत त्यांची भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांसह शहांशी चर्चा झाली. त्यामुळे या बैठकीत मनसेच्या महायुतीच्या प्रवेशाचा ठोस निर्णय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे खरेच घडले तर तो महाविकास आघाडीला मोठा झटका असेल असे मानले जात आहे.
दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ”राज ठाकरे हे दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या या भेटीबाबत सर्व माहिती येणाऱ्या काही तासांत स्पष्ट होईल. मात्र राज ठाकरे जो निर्णय घेतील तो राज्याच्या, पक्षाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचाच असेल. ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणे हे आमचे कर्तव्य असून यापुढेही त्यांच्या आदेशाचे पालन करू”.
