
जळगाव मिरर | १० जून २०२४
मी नरेंद्र दामोदरदास मोदी…. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रविवारी हे शब्द उच्चारताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित दिमाखदार सोहळ्यात रविवारी नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेच सलग तीनदा पंतप्रधान झाले होते.
मोदींसोबत ७१ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, यामध्ये ३० कॅबिनेट, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. एकट्या भाजपला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार असून या मंत्रिमंडळात तेलगू देसम पक्ष, संयुक्त जनता दल, शिवसेना, धर्मनिरपेक्ष जनता दल, यांसह ९ सहकारी पक्षांच्या ११ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, पवनकल्याण यांचा जनसेना याशिवाय आसाम गण परिषद, आजसू, यूपीपीएल, एसकेएम या घटक पक्षांना एकही मंत्रीपद मिळू शकलेले नाही.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. गत सरकारमधील अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर, पियूष गोयल, अश्विनी वैष्णव, सर्बानंद सोनोवाल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, गिरीराज सिंग, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू, मनसुख मांडविया यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळात २७ ओबीसी, १० एससी आणि ५ एसटी समुदायातील मंत्र्यांचा समावेश करत प्रादेशिक व जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियूष गोयल यांना कॅबिनेट मंत्रीपद, प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री-स्वतंत्र प्रभार, तर रक्षा खडसे, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. महाराष्ट्रात यंदा एनडीएला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही; परंतु येत्या काही महिन्यांत होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्याला काहीसे झुकते माप देण्यात आले आहे. लोकसभेचे ७ खासदार असलेल्या शिवसेनेला प्रतापराव जाधव यांच्या रूपाने एकमेव स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. याउलट ५ खासदार असलेला लोजप, २ खासदार असलेला जेडीएस, एक खासदार असलेला हम यांना प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. १६ खासदार असलेल्या तेलगु देसम पक्षाला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद तर १२ खासदारांच्या नितीशकुमारांच्या जेडीयूला देखील अशाच प्रकारे दोन मंत्रीपदे देण्यात आली आहेत.
गेल्या सरकारमधील ३५ मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात पुन्हा घेण्यात आले आहे. ३३ जण प्रथमच केंद्रात मंत्री झाले आहेत. या सरकारमध्ये ७ महिला मंत्री आहेत. राज्याच्या जबाबदारीतून मुक्त करत लोकसभेच्या रिंगणात उतरवलेले शिवराजसिंग चौहान, मनोहरलाल खट्टर या माजी मुख्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे महत्त्वाची खाती दिली जातील. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा हे पाच वर्षांनंतर मंत्रिमंडळात परतले आहेत. पुन्हा मंत्री झालेले पियूष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव हे राज्यसभेचे सदस्य आहेत; परंतु आता लोकसभा खासदार झाले आहेत. पंजाबच्या लुधियानातून पराभूत झालेले रवनीत सिंग बिट्टू यांचादेखील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदीव, श्रीलंका, सेशेल्स या देशांच्या प्रमुखांसह देशविदेशातील सुमारे ८ हजार पाहुणे उपस्थित होते. इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांच्या प्रमुखांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला असला, तरी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हजेरी लावली. शपथ सोहळ्यानंतर पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींकडून मेजवानी देण्यात आली.





















