
जळगाव मिरर | २२ मे २०२५
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना मात्र अद्यापही याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यावर आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी भाष्य केले आहे. मराठी लोकांच्या मनात दोन ठाकरे एकत्र यावे, यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. चर्चेची दार आम्ही कधीच बंद केली नसल्याचे अनिल परब यांनी म्हंटले आहे.
“सगळं वाद बाजूला ठेवून सोबत यायला तयार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांनी ठरावयाचं आहे आमच्या सोबत एकत्र यायचं की नाही. आता राज ठाकरेंनी ठरवावं कोणसोबत युती करावी. महाराष्ट्र हितासाठी आम्ही चर्चेसाठी सकारात्मक आहोत. दोन्ही सेनेमध्ये पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील त्यानुसार पुढे जाऊ जशा निवडणुका जवळ येतील तसे दोन नेते निर्णय घेतील. मी छोटा नेता आहे”, असे अनिल परब म्हणाले.
यावेळी अनिल परब यांनी भुजबळ यांच्या मंत्रीपदावरून भाजपवर देखील निशाणा साधला. “भाजपने ज्याचा सतत विरोध केला होता तो विरोध झुगारुन छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिले. भाजप आपल्याच भूमिकेला तिलांजली देत आहे. हे सरकार राक्षसी बहुमतात आहे, भाजप कार्यकर्ते दुःखी आहेत, त्यांनी मेहनत करून सत्तेत येऊन सुद्धा काही फायदा होत नाही. त्यामुळं कटशाह करण्याचा काम या सरकारमध्ये सुरु आहे”, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला.





















