औरंगाबाद : वृत्तसंस्था
आम्ही ४० आमदारांना भरभरून दिले. मात्र त्यांना त्याचे अपचन झाले. या ४० गद्दार आमदारांबद्दल आमच्या मनात द्वेष नाही, पण दुख आहे. या आमदारांनी आपल्या आणि वडील उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. राज्याचं सगळं सुरळीत सुरू होते. त्याला कोणाची तरी दृष्ट लागली.औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली आहे.
नवे सरकार लवकरच पडणार असून त्यामुळे लवकरच मध्यावधी निवडणुका होतील. या निवडणुकीत औरंगाबादमधील पाचही बंडखोर आमदार पडणार, नवे आमदार विजयी होतील, असा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. औरंगाबादमधील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रा काढत असून, यावेळी त्यांनी हा दावा केला. राज्यात उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी केली, रस्ते होत होते, पर्यटनाचा विकास होत होता. संभाजीनगर, धाराशीवच्या नामांतराचे श्रेय घेण्याचाही त्यांनी यावेळी प्रयत्न केला. ज्या पक्षानी सर्व काही दिले त्यांनी पाठीत खंजीर का खुपसला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जिथे गेला आहात तिथे सुखात राहा. तुमच्यावर काही दबाव आली असतील. स्वतःला वॉशिंग मशिनमध्ये टाकले तर स्वच्छ धुवून या. पण लाज बाळगा आणि आमदारकीचा राजीनामा द्या, असे आव्हान त्यांनी बंडखोरांना केले. ज्यांना असे आजही वाटत असेल की गद्दारी केली, विश्वासघात केला तर मातोश्रीवर परत या. आमचे मन संकुचित नसून मोठे आहे. मातोश्रीचे दरवाजे उघडे आहे. पण ही केलेली गद्दारी ही माणुसकीशी असलेली गद्दारी असते, असेही ते म्हणाले. हे अल्पायुषी सरकार ठरणार आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे, बेइमान, निर्लज्ज आणि घटनाबाह्य सरकार असल्याने ते पडणारच असे लिहून घ्या. उद्धव ठाकरे यांची ऑपरेशन्स झाली होती, त्यामुळे ते लोकांना भेटू शकत नव्हते, असेही ते म्हणाले.




















