
एलपीजी, बँक, इनकम टॅक्स यांसारख्या अनेक गोष्टींच्या किमतींमध्ये बदल करण्यात आले आहे. त्यामुळे या किमतींचा अनेकांवर परिणाम होणार असल्याचे दिसून येते. आजपासून ऑगस्ट महिना सुरू झाला आहे.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना कळवले आहे की, १ ऑगस्टपासून ५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली जाईल. याअंतर्गत चेक जारी करणाऱ्याला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे बँकेला द्यावी लागेल. त्यानंतरच चेक क्लिअर होईल. पॉझिटिव्ह पे सिस्टीमच्या माध्यमातून बँक ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या धनादेश फसवणुकीपासून वाचवणार आहे. १ ऑगस्टपासून बँकेच्या ग्राहकांना ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या धनादेश वाटण्याअगोदर डिजिटली कन्फर्म करावे लागणार आहे. यापुढे कोणालाही चेक देण्यापूर्वी बँकेला ग्राहकाचे पत्र द्यावे लागणार आहे.
एलपीजी सिलेंडर
१ ऑगस्टपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आले आहे. पूर्वी १९७२.५० रुपये सिलेंडरची किंमत होती. आता मुंबईत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १९३६.५० रुपयांत मिळणार आहेत. तर घरगूती एलपीजी सिलेंडरसाठी १०५२ रुपये द्यावे लागतील. गॅस सिलिंडरचे दर ३६ रुपयांनी कमी करण्यात आले आहे. या किमती दिल्ली, मुंबई ते चेन्नई आणि देशातील इतर सर्व शहरांमध्ये लागू झाल्या आहेत.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली. त्यामुळे आता ग्राहकांना धक्का बसला आहे. एचडीएफसीने शनिवारी रिटेल प्राइम लेंडिंग (किरकोळ प्राथमिक कर्ज) दर वाढवला. आरपीएलआर हा बेंचमार्क कर्ज दर आहे. एचडीएफसीने त्यात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. हे दर १ ऑगस्टपासून लागू होतील. याचा परिणाम नवीन आणि विद्यमान ग्राहकांवर होणार आहे. दोघांसाठी कर्जाचा ईएमआय वाढेल आणि त्याचा मासिक बजेटवर परिणाम होईल.
इन्कम टॅक्स
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. आजपासून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी लेट फी भरावी लागणार आहे.ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना ५००० रुपयांच्या दंडासह ३१ डिसेंबर २०२२पूर्वी आयटीआर भरावा लागेल. त्याचबरोबर ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना १००० दंडासह आयकर विवरणपत्र भरावे लागेल.
पीएम किसान सन्मान निधी
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या केवायसीसाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून शेतकरी केवायसी करू शकणार नाहीत.




















