जळगाव मिरर । ३० ऑगस्ट २०२३
राज्यात भाजपला हरविण्यासाठी सर्वच विरोधक एकत्र आले असून आता विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर उद्या ३१ ऑगस्ट मुंबईत बैठक होणार असून या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार, जागा वाटप कसं होणार, संयोजक कोण असणार या सर्व पार्श्वभूमीवर उद्या बैठक होणार असल्याचं सांगितलं जातंय. या बैठकीची माहिती देण्याकरता महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी भाजपाला सुनावले आहे.
इंडिया आघाडीला अद्यापही संयोजक ठरवता आला नाही, ते पंतप्रधान काय ठरवणार अशी टीका भाजपाकडून सातत्याने केली जात आहे. यावरून पत्रकारांनी आज प्रश्न विचारल्यावर सुरुवातीला शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, “इंडिया आघाडीच्या संयोजकासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम करू शकतो. या आधारे संयोजक ठरवू.” शरद पवार बोलत असतानाच उद्धव ठाकरे यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत. पण भाजपाकडे काय पर्याय आहे? गेल्या १० वर्षांत त्यांनी काय केलं? सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे. कर्नाटकात पाहिलं आपण, कोणतंच यश मिळालं नाही. बजरंग बलीनेही त्यांना आशीर्वाद दिला नाही.”