
जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२४
राज्यात महायुती सरकारने गेल्या चार महिन्यापूर्वी ‘लाडकी बहिण योजना’ सुरु केली असून यावर अनेक ठिकाणी हि योजना बंद होत असल्याचे दिसून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर खुलासा केला आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात गेम चेंजर ठरु शकणारी लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली, अशी खोटी बातमी काही वृत्तपत्रे आणि चॅनेलने लावली. ही धादांत खोटी बातमी त्यांनी का लावली? हे कळायला मार्ग नाही. ही योजना अत्यंत चांगली आहे. राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या बातम्यांवरून अजित पवारांनी माध्यमांवर टीका केली.
लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाने आणली आहे. मंत्रिमंडळाने या योजनेला मंजूरी दिली आहे. अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी लागणारी सर्व तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजेच 9 महिन्यांसाठी ही तरतूद आहे. त्यानंतर पुढच्या अर्थसंकल्पात पुढील बारा महिन्यांची तरतूद करण्यात येईल. ही योजना चालू राहणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघात उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. आघाडी किंवा युतीमध्ये प्रत्येक पक्षाला देखील मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. मात्र, आघाडी आणि युती करतो त्यावेळी सर्वांना शंभर टक्के मनासारख्या गोष्टी घडत नसतात. प्रत्येकाला दोन पावले पुढे किंवा मागे सरकावे लागते. त्यातून थोडासा विलंब लागतो, असे म्हणत अजित पवार यांनी जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. एकाच पक्षाने सर्व जागा लढवण्याचे ठरवल्यावर असे काही होत नाही. मात्र युती किंवा आघाडी जाहीर झाल्यानंतर असे घडत असते. ते आजच घडतेय असे नाही तर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपण तसे पाहिले आहेत.
आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना ठराविक काळात जागा वाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे. यामध्ये फार लांबवले तर कार्यकर्ते संभ्रमात राहतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना चित्र स्पष्ट दिसले पाहिजे. त्यानंतर ते आणखी जोमाने कामाला लागतात, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.
जे पैसे सापडले, त्या पैशांची चौकशी करा, त्यातून दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. चौकशीनंतरच त्याविषयी बोलायला हवे. काहीजण बिन बुडाचे आरोप करतात, असा पलटवार देखील अजित पवार यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील काही जागांसंदर्भात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र बसून चर्चा करण्यासंदर्भात काही मुद्दे होते. त्यामुळे तशी चर्चा केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.